पहिलीचा धडा
शाळांचे नवीन वर्ष
सुरु होऊन दुसरा आठवडा पण संपत आला. नवीन वर्ष, नवीन वर्ग
आणि नवीन बाई, या नवीन नवलाईचे कौतुक आणि आठवण आपण प्रत्येकानेच शाळेत असताना
अनुभवलेली आहे.
त्यामध्ये सुद्धा पहिलीचा
पहिला दिवस आपण कोणीच विसरू शकत नाही. आत्ता जरी शाळेमध्ये शिशुवर्गात दोन तीन वर्षे
मुले जात असली तरी मोठ्या शाळेचा गणवेश घालून जाणारी मुले एकदम मोठी पण रुबाबदार
वाटू लागतात. बहुतेकांचा गणवेश हा वाढत्या अंगाने शिवलेला असल्याने अंगावर प्रशस्थपणे
बसलेला असतो. खांद्यावरचे रिकामे दप्तर खांद्यावरुन लोंबत असते. आईचा हात धरून शाळेत
प्रवेश करताना मोठेपणाचा भाव कितीही जरी चेहरयावर असला तरी नजर मात्र कावरी बावरी झालेली
असते. आईचा हात घट्ट धरून प्राथमिक शाळेकडे वळताना पाउले मात्र शिशु वर्गाकडे वळत
असतात. असे चित्र बहुतेक सर्व शाळांमधून पहिल्या दिवशी आढळून येते.
पहिल्या दिवसाची आणखीन
एक गंमत शहरात नाही तरी खेड्यांमध्ये अनुभवता येते. शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून
निघणारी या छोट्या मुलांची मिरवणुक निघते. काही वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्हातील वरवडे
गावात ही मिरवणूक बघण्याचा योग आला होता. वरवडे गाव तशे छोटे. साधारण हजार एक
घरांचे असेल. गावात जिल्हा परिषदेची सातवी
पर्यंतची बैठी कौलारू शाळा. शाळेसमोरील झाडाखाली पहिलीतील जेमतेम वीस मुले जमली
होती. शाळेचा नवीन गणवेश चार पाच मुलांच्या अंगावर असेल. काही जणांच्या अंगावर
आपल्या मोठ्या भावाचा अथवा बहीणीचा गणवेश होता. काही मुले मुली नवीन ठेवणीतील कपडे
घालून आले होते. उरलेल्या मुलांनी रोजचेच साधे मळलेले किंवा कदाचित कुठेतरी किंचित
फाटलेले कपडे अंगावर घातले होते. सर्वांच्या चेहरयावर आनंद
आणि हसू मात्र सारखेच फुललेले दिसत होते. वरवडे गाव तसे टिपिकल कोकणातील खेडेगाव.
लाल माती आणि जांभा दगडाच्या अरुंद वळणावळणाच्या रस्त्यावरून ती फेरी डुलत झुलत
जातानाचे दृश्य खरोखरच विलोभनीय होते. आया बापड्या सहीत अख्खे गाव वाडीत उभे राहून
कौतुकाने त्यांना चणे साखरफुटाण्याचा खाऊ बच्चे कंपनीला वाटत होते.
ठाण्यात सरस्वती
मंदिर प्राथमिक शाळेचे पहिल्या दिवशीचे आमंत्रण दरवर्षी असते. सर्व शिक्षण अभियान
अंतर्गत अभ्यासक्रमाची पुस्तके वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. शाळेचा हा
कार्यक्रम मी सहसा कधीच बुडवत नाही. नवीन पुस्तकांचा स्पर्श आपल्याला पण हवा हवासा
वाटतो. मुले खेड्यातील असोत किंवा शहरातील, नवीन पुस्तके हातात घेतानाचा त्यांचा
आनंद आपल्याला लहानपणाचा ठेवा देत असते.
हे सर्व लिहण्याचे कारण
म्हणजे या वर्षी हे सर्व मी मिस केले. दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी नेटवर बालभारतीचे
पहिलेचे मराठीचे पुस्तक बघत असताना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ससा आणि कासवाची
गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. डोंगरावर पळत जाऊन पहिल्यांदा पोचण्याच्या
शर्यतीत कासव हळूहळू पण चिकाटीने चालत राहतो. घमेंडी ससा ताजे गवत खाऊन झाडाखाली झोपून
राहतो आणि शर्यत हारतो. या निती कथेतून ’स्लो बट शुअर विन द रेस’ ही शिकवण मुलांना दिली जात होती. पुस्तकात ही गोष्ट चित्र कथेच्या रुपात
दिलेली आहे पण त्याचा शेवट शिक्षक आणि पालकांच्यावर सोपविलेला आहे. पहिली दोन चित्रे नेहमीच्या गोष्टी प्रमाणे आहेत. तिसऱ्या चित्रात ससा
डोंगराखाली असलेल्या नदीपाशी अडकून थांबलेला आहे. शेवटच्या
चित्रात कासवाच्या पाठीवर बसून ससा नदी पार करीत आहे. अतिशय कल्पकतेने हा अध्याय शिक्षकांसाठी बाल भारतीने
दिला आहे. यासाठी संपादक मंडळाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. गोष्टीच्या
शेवटला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शेवटच्या चित्रात ससा
कासवाच्या पाठीवर बसून नदी पार करित आहे हा
संदर्भ लक्षात घेता सांघिक भावना
व्यक्तीगत यशापयशा पेक्षा मोठे आहे. हा मूल्य शिक्षणाचा धडा लहान वयातच मुलांना
देण्याचा अतिशय स्तुत्य प्रयज्ञ बालभारतीने केला आहे. वरील पाठातील शेवटचे चित्र
जर दिले नसते तर तो व्यवस्थापन अभ्यासक्रमातील एक मानसशास्त्रीय कुट प्रश्न झाला
असता. कासवाने सशाला पाठीवर घेतले नसते तर सशाने काय केले असते? या प्रश्नाचे
उत्तर देण्याची जबाबदारी प्रत्येक पालकाची आहे.
सुरेंद्र दिघे
कार्यकारी विश्वस्त – जिज्ञासा ट्रस्ट ठाणे